पुणे | राजस्थानमधील एकही मूल आर्थिक, सामाजिक किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून राजस्थान सरकारने क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. राजस्थानमध्ये शैक्षणिक चळवळ रूजण्यासाठी महाराष्ट्रात स्थायिक राजस्थानी बांधवांनी योगदान द्यावे, असे आवाहन राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी केले.
राजस्थान फौंडेशन, पुणे चॅप्टरच्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आज आयोजित शैक्षणिक संवाद कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. दी पूना मर्चंट चेबरच्या कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर राजस्थान फौंडेशन, पुणे चॅप्टरचे अध्यक्ष मंगलचंद चौधरी, उपाध्यक्ष राजेंद्र बाठिया, राजस्थान फौंडेशन, मुंबई शाखेचे अध्यक्ष गणपत कोठारी, ज्येष्ठ विधीज्ज्ञ अॅड. एस. के. जैन, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आई इंद्रा डूडी आणि वडील साईराम डुडी, विशेष सचिव आणि राजस्थान फौंडेशनच्या आयुक्त आयएएस डॉ. मनीषा अरोरा, राज्य परियोजना निदेशक आणि समग्र शिक्षा, राजस्थानच्या आयुक्त आयएएस डॉ. रश्मी शर्मा उपस्थित होते.
यावेळी बोलताना मदन दिलावर म्हणाले की, उद्योग,व्यापार आणि नोकरी निमित्त राजस्थानमधून अनेक परिवार महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये स्थायिक झाले. महाराष्ट्रत त्यांनी जम बसवला हे नक्कीच कौतुकास्पद आहे. राजस्थानमध्ये सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण होण्यासाठी महाराष्ट्रत स्थायिक राजस्थानी बंधु भगिनींनी सक्रिय सहभाग देऊन राजस्थानच्या मातीचे ऋण फेडावे. महाराष्ट्रातील ज्या उद्योजकांना राजस्थानमध्ये नाविन्य पूर्ण कल्पना राबवायची असेल अशा सर्व उद्योजकांचे स्वागतच करण्यात येईल. प्रकल्प मंजूर होण्याच्या दृष्टीने सरकारी पातळीवर कोणतीही अडचण येणार नाही, याची मी ग्वाही देतो. शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असल्यास कायद्याच्या चौकटीत राहून नियमांमध्ये शक्य तेवढी लवचिकता आणण्याचा प्रयत्न केला जाईल. राजस्थान फौंडेशन, पुणे चॅप्टरच्या सभासदांनी राजस्थानची मूळ संस्कृती, भाषा आणि परंपरा पुण्यामध्ये रूजवली आहे. राजस्थान फौंडेशनमार्फत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठे कार्य उभे केले आहे. पुण्यासह महाराष्ट्रात राजस्थानी बांधवांनी त्यांच्या उद्योग-व्यवसायाची पाळेमुळे रूजवत असताना त्याची एक शाखा राजस्थानमध्ये देखील सुरू करावी. राजस्थानमध्ये शिक्षणाचे जाळे निर्माण करण्यासाठी आजपर्यंत महाराष्ट्राने मदतीचे हात दिले असून त्याची वारंवारीता वाढणे आवश्यक आहे.
राजस्थान भवन उभारणार!
पुण्यातील राजस्थानी बांधवांसाठी पुण्यामध्ये राजस्थान भवन उभारणार अशी घोषणा मंत्री दिलावर यांनी करताच सभागृहात उपस्थित राजस्थानी बांधवांनी टाळ्यांच्या गजरात या घोषणेचे स्वागत केले. यावेळी आयएएस डॉ. मनीषा अरोरा आणि आयएएस डॉ. रश्मी शर्मा यांनी राजस्थानमध्ये राबविले जाणारे विविध शैक्षणिक उपक्रम आणि योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच यावेळी अॅड. एस. के. जैन आणि शेखर मुंदडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुणे चॅप्टरचे अध्यक्ष मंगलचंद चौधरी यांनी पुणे चॅप्टरच्या आगामी उपक्रमांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजस्थान फौंडेशन, पुणे चॅप्टरचे उपाध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी केले. सूत्रसंचलान ओमप्रकाश चौधरी यांनी केले, तर महेंद्र व्यास यांनी आभार मानले.








